मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा परिणामांना सामोरे जा असा इशाराच भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. मराठा आरक्षण अध्यादेशाबाबत ट्विट करुन त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. “मी सरकारला सांगू इच्छितो की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे. यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे” असं उदयनराजेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

आणखी काय म्हणाले उदयनराजे?
“मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करु. या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला खिळ बसली आहे. सरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. याआधी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात गेले, तरी तिथे ते टिकवता आले. पण आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा धक्काच बसला आहे. फक्त राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही वाईट वेळ मराठा समाजावर आली आहे. महाराष्ट्र सरकार ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षण देण्यासाठी कुठलीही विशेष बाब सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहे. हे करत असताना राज्य सरकारने कुठलीही खबरदारी घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयात पूर्ण सुनावणी झाली नसताना न्यायालयासमोर काय डॉक्युमेंट्स आहेत त्याची पूर्ण चर्चा झाली नसताना इतका मोठा निर्णय होणं हे मराठा समाजावर अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे अध्यादेश काढून सरकारने आरक्षण अबाधित ठेवावं हा एकच मार्ग त्यांच्यासमोर आहे.”