काय व्हायचं ते होऊद्या मी खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा लोकसभा मतदारसंघातली फेरनिवडणूक निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघातल्या मतांमध्ये फरक असल्याच्या तक्रारी आल्या. ज्यानंतर एक फेसबुक पोस्ट लिहून उदयनराजे भोसले यांनी ही मागणी केली.

यासंदर्भात राज्यातल्या इतर उमेदवारांनीही निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान हा लोकशाहीचा घात आहे, काय व्हायचं ते होऊ द्या मी खासदारकीचा राजीनामा देतो सातारा लोकसभा मतदारसंघातली निवडणूक बॅलेटपेपरवर घ्या असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्टच लिहिली आहे.

अनेक प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण सामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमाने जाणाऱ्या पैशांचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार 300, तर ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी 33 हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच साडेचार हजार कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यातही किती पळवाटा आहेत असेही उदयनराजेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा केला पाहिजे अशीही मागणी उदयनराजेंनी केली आहे.

निवडणूक आयोगाच्या साईटवरील माहितीतही तफावत असल्याचे स्पष्ट झाल्यावर ती माहितीच काढून टाकण्यात आली. व्हायरसमुळे माहिती गेली असे आयोग म्हणतो. मग, लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार? असाही प्रश्न उदयनराजेंनी विचारला आहे.