महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झाला. आम्हीच निवडणूक जिंकलो होतो. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल होता मात्र उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला असं आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने जे.पी. नड्डा यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. काँग्रेससोबत तुम्ही निवडणूक जिंकता, मात्र जे राज्यांमधले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला जिंकताना कष्ट घ्यावे लागतात. त्यावर जे.पी. नड्डा म्हणाले "महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तर आमच्यासोबतच निवडणूक लढले होते. महाराष्ट्रात आम्ही हरलो नाही. महाराष्ट्रात आमच्यासोबत विश्वासघात झाला आहे. सत्तेसाठी भाजपाचा विश्वासघात करण्यात आला. महाराष्ट्रात आम्ही निवडणूक जिंकलो होतो. फडणवीस मुख्यमंत्री होतील असाच जनमताचा कौल होता. " असं नड्डा यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र में हमारी हार नहीं हुई है, जनता ने देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में भाजपा को वोट दिया लेकिन वहां सत्ता के लिए धोखा हुआ है। - श्री @JPNadda ,राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपा.#JPNaddaOnZeeNews #1YearOfModi2 pic.twitter.com/yLlJR0jbTY — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 5, 2020 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १०५ जागा जिंकल्या. तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र अडीच-अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद यावरुन दोन्ही पक्षांचं घोडं अडलं. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये झालेला वाद सर्वश्रुत आहे. तसंच या दोन्ही पक्षांनी एकमेकांशी काडीमोड घेतला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी तयार होऊन महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्त्वात आलं. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. निवडणूक निकाल लागल्यापासून काय काय घडलं ते महाराष्ट्राला ठाऊक आहेच. भाजपा आणि शिवसेना यांनी निवडणूक एकत्र लढली. मात्र निवडणूक निकालानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या. आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी भाजपाची हार महाराष्ट्रात झालेलीच नाही असं म्हटलं आहे. सत्तेसाठी आमच्यासोबत विश्वासघात करण्यात आला आणि उद्धव ठाकरेंनी तो केला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.