उद्धव ठाकरे स्वतःला वाघ म्हणवतात, वाघ पिंजऱ्यातला की पिंजऱ्याबाहेरचा? असा प्रश्न विचारत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. मोदींच्या नावावर निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांसोबत हातमिळवणी केली ही भूमिका तर गांडुळासारखी झाली. या मुख्यमंत्र्यांना अधिकारीही हसतात. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे म्हणजे दिशाभूल करणारे, थापा मारणारे मुख्यमंत्री आहेत. मराठ्यांना आरक्षण हा माणूस कधीही देऊ शकत नाही कारण मराठ्यांचा द्वेष करणारा हा माणूस आहे असाही आरोप नारायण राणेंनी केला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या माणसाला कधीही मुख्यमंत्री केलं नसतं असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

कळसूत्री बाहुली ही किमान तालावर तरी नाचते उद्धव ठाकरेंना नाचताही येत नाही. मोदींच्या जीवावर निवडणूक लढवली म्हणून ५६ आमदार तरी आले पुढच्या वेळी तेवढेपण येणार नाहीत. दुसऱ्याच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना काहीही करता येत नाही. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. अत्यंत पुळचट आणि शेळपट माणूस आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. काल झालेलं दसरा मेळाव्याचं भाषण म्हणजे काहीही अर्थ नसलेलं भाषण होतं असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. आत्तापर्यंतचं सगळं अपयश झाकण्यासाठी कालचं भाषण करण्यात आलं असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

दसरा मेळाव्यात झालेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राणे पितापुत्रांचा उल्लेख बेडुक असा केला होता. तसंच मोदींवरही टीका केली होती. भाजपावरही घणाघाती टीका केली होती. या सगळ्या प्रश्नांना आज नारायण राणे यांनी तिखट शब्दांमध्ये टीका केली.