२०१९ मध्ये निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडली हा भाजपा सर्वात मोठा अपेक्षाभंग होता असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. महायुती म्हणून लढल्यानंतर शिवसेना बाहेर पडली. देशात असं कधीही घडलेलं नव्हतं. शिवसेना बाहेर पडेल असं वाटलं नव्हतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ज्या जागा लढलो त्यातल्या १०५ जागा आम्हाला मिळाल्या. आम्हाला यापेक्षा जास्त जागा अपेक्षित होत्या. १६४ पैकी १३० जागा येतील अशी अपेक्षा होती. मात्र आमच्या १०५ जागा आल्या. मात्र याला आम्ही पराभव म्हणणार. जनादेश आमच्याजवळ होता, मात्र आमच्या मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केला त्यामुळे आम्हाला विरोधात बसावं लागलं असं देवेद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. "जनतेने जनादेश आम्हाला दिला, मात्र शिवसेनेने फारकत घेतली आणि मोडतोड करुन सरकार स्थापन केलं. शिवसेना जे काही वागली त्याला काहीही अर्थ नव्हता." असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. " राष्ट्रवादीचे अजित पवार आमच्याकडे आले होते. आम्ही कोणत्याही नेत्याकडे गेलो नव्हतो. ते आले त्यांनी आम्हाला समर्थनाचं पत्र दिलं. अजित पवारांना सोबत घेऊन शपथविधी हा आमचा गनिमी कावा होता. तो फसला, हे आम्हाला मान्य आहे " असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, ते बाहेर पडले असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. "शिवसेना काँग्रेससोबत जाईल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं. आमचा हा अतिआत्मविश्वास होता हे आता वाटतं आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन ते करुन दाखवलं. काँग्रेसही जाईल असं वाटलं नव्हतं. मात्र सर्वात जास्त विश्वास शिवसेनेवर होता. शिवसेना जाणार नाही हा विश्वास होता मात्र तो संपला याची जाणीव आम्हाला झाली." असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.