युतीसाठी शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला अशी टीका आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत म.गो. वैद्य यांनी केली आहे. तसेच जानेवारी महिन्यापर्यंत सरकार राम मंदिरासंबंधी अध्यादेश काढेल असे वाटत नाही असेही मा. गो. वैद्य यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती व्हावी म्हणूनच उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मा.गो. वैद्य यांनी त्यांचे हे मत मांडले आहे.

आपल्याला ठाऊक आहेच की राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या गाठली आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस ते अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी लक्ष्मण किला या ठिकाणी भेट दिली. शिवसेनेने निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातच उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. आता त्यांच्यावर मा. गो. वैद्य यांनी टीका केली आहे.

शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचं सरकार महाराष्ट्रावर राज्य करत आहे. मात्र या दोन्ही पक्षांमधून विस्तव जात नसल्याचं चित्र महाराष्ट्रानं पाहिलं आहे. अशात भाजपाने अनेकदा राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी मात्र शिवसेना पक्ष प्रमुख यांनी हा मुद्दा उचलून धरत थेट अयोध्येला जाण्याचीच घोषणा केली होती. त्याप्रमाणे ते अयोध्येत पोहचलेही आहेत. राम मंदिरासंबंधीचा अध्यादेश सरकार काढणार असेल तर आम्ही पाठिंबा देऊ असे उद्धव ठाकरेंनी अयोध्येत पोहचल्यावर जाहीर केले. आता रविवारी ते अयोध्येत काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अध्यादेशाबाबत जेव्हा मा. गो. वैद्य यांना विचारले तेव्हा सरकार सध्या तरी अध्यादेश आणेल असे वाटत नाही असे वैद्य यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणासाठी जानेवारीतली जी तारीख दिली आहे तोपर्यंत सरकार वाट बघेल असा अंदाज आहे असे वैद्य यांनी म्हटले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने मंदिराच्या बाजून निर्णय दिला नाही किंवा हे  पुढची तारीख दिली तर सरकार अध्यादेश आणू शकते असाही अंदाज वैद्य यांनी वर्तवला आहे.