राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल(बुधवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला. यावेळी हिंदुत्वाच मुद्दा निघाल्याने बाबरी मशीद व राम मंदिराच्या मुद्यावरून देखील त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच, बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानाचा देखील त्यांनी सभागृहात पुनरुच्चार केला होता. यावर समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी संताप व्यक्त करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला व काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. तसेच मुस्लीम मंत्र्यांनी जरा लाज बाळगावी व राजीनाम द्यावा, असं देखील आझमी यांनी म्हटलं आहे.

“उद्धव ठाकरे विसरले आहेत की ते मुख्यमंत्री आहेत. बाबरी मशीदीत मूर्ती ठेवणं आणि मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. जर मुख्यमंत्री गुन्हेगारी कृत्य स्वीकरत असतील तर हे दुर्दैवी आहे.” असं म्हणत आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“काय हे तुमचं हिंदुत्व, काय हे तुमचं दुर्दैव”, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं!

तसेच, “मला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सांगावं वाटत आहे की, हे सरकार किमान सामायीक कार्यक्रमावर बनलेले आहे. मात्र इथं मंदिरं व मशीदींवर चर्चा होत आहे. तुम्ही भविष्यात कशा पद्धतीने पुढे जाणार यावर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे.” असे सांगून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे इशारा दिला आहे.

याशिवाय, “मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सीएए-एनआरसी लागू करणार नाही, काँग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसने असे म्हटले होते की ५ टक्के आरक्षण (मुस्लिमांसाठी) असेल, आता ते सत्तेत आहेत. मुस्लीम मंत्र्यांना थोडी लाज वाटायला हवी आणि त्यांनी राजीनामा द्यावा.” असं देखील आझमी यांनी म्हटलेलं आहे.

“ज्यांना खंडणी वसूल करायची सवय असते, त्यांना जनतेचं समर्पण काय आहे? हे समजत नाही”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ? –
“बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं नव्हतं. बाबरी पाडल्यानंतर येडेगबाळे पळून गेले होते, बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. आता विषय असा झालेला आहे, बाबरी कुणी पाडली? आम्हाला माहिती नाही बाबारी आम्ही पाडलेली नाही. मात्र शिवसेना प्रमखांनी सांगितलेलं आहे, जर ते माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे. नुसता अभिमान नाही तर गर्व आहे. म्हणजे बाबरी पाडली कुणी? आम्ही नाही पाडली. सहा वर्षे केंद्रात सत्ता असताना देखील, राम मंदिरासाठी कायदा करा, कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय कुणी दिला, सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसे मागत आहेत. म्हणजे पैसे दिले कोणी? जनतेने दिले, आमचं नाव आलं पाहिजे.” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाबरी मशीद व राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपावर टीका केली होती.