शिवसेना नेते व परिवनहमंत्री अनिल परब यांना आज ईडी कडून नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या बातमीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खबळबळ माजली आहे. कारण, आजच नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची एकीकडे सांगता झाली आणि दुसरीकडे अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे.

मोठी बातमी! अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस; ३१ ऑगस्टला हजर होण्याचे आदेश

“शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. क्रोनोलॉजी कृपया समजून घ्या. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र.” असं संजय राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

अशा कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही डगमगणार नाही –

तसेच, “यामध्ये भूमिका काय असणार, भाजपाच्या भाषेत सांगायचं तर टायमिंग बघा, टायमिंग. क्रोनोलॉजी समजून घ्या. रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली. त्या जिल्ह्याचे अनिल परब हे पालकमंत्री आहेत आणि ती जन आशीर्वाद यात्रा संपली व ताबडतोब रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वरच्या सरकाचं लव लेटर आलं ईडीचं, येऊ द्या. कायदेशीर लढाई आहे, आम्ही काय कुणाल धमक्या देणार नाही, आम्ही नॉर्मल माणसं आहोत. नॉर्मल माणसं असल्यामुळे, नॉर्मल माणसं कायदेशीर लढाई लढतात आणि जे असत्य आहे, जे खोटं आहे, बनावट आहे त्याचा पर्दाफाश करतात. आमच्या लढाईला नैतिकतेचं बळ आहे. आम्ही गुन्हेगार नाही आहोत. तुम्ही आमच्यावर लादता आहात हे सगळं. पण असे तुम्ही कितीही कागद पाठवा, हरकत नाही. तुम्ही करत रहा, आम्ही लढत राहू. महाराष्ट्राची आणि शिवसेनेची लढण्याची परंपरा आहे. आणखी एक सांगतो, अशा कितीही नोटिसा आम्हाला पाठवल्या कितीही खोटेनाटे आरोप केले, चिखलफेक केली. तरी शिवसेना, शिवसेनेचे मंत्री, आम्ही सगळे नेते अजिबात डगमगणार नाही, हे लिहून घ्या. मी कालही म्हणालो लढाई कायदेशीर होईल, जर कागद हे त्यांचं शस्त्र असेल तर त्या कागदांच्या सुरनळ्या हे आमचं अस्त्र आहे.” अशी देखील प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे

अनिल परब यांनी दिले होते नारायण राणेंच्या अटकेचे आदेश?; व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान महाड येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या खळबळजनक विधानानंतर, राज्यात बराच गोंधळ उडाल्याचे दिसले. या प्रकरणी नारायण राणेंवर अटकेची कारवाई देखील झाली. मात्र त्याच दिवशी रात्री उशीरा महाड कोर्टाने त्यांना जामीन देखील मंजूर केला. दरम्यान, राणेंना अटक करण्यासाठी नेमकं कुणी सांगितलं होतं, याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यामध्ये ते अटकेसंदर्भात बोलताना दिसून येत आहेत, यावरून भाजापाने परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली असताना, आता त्यांना ईडीकडून नोटीस बजावली गेली आहे.

“…आता पुढचा नंबर अनिल परब यांचा लागणार”

तर, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत  अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला होता. “ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं.