महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेले पीक वाया गेले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती व त्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं असून ५३ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचं नुकसान झालं आहे. कोकणात ४६, नाशिकमध्ये ५२ आणि नागपूरमध्ये ४८ तालुके बाधित झाले आहेत.

पंचनाम्याला विलंब लागत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइल फोनवरुन फोटो अपलोड केले तरी चालतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलवली असून कशा स्वरुपाची तात्काळ मदत करता येईल, काय अतिरिक्त मदत देता येईल त्यादृष्टीने निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडेही मदतीची मागणी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांचं हातातलं पीक वाया गेल्यामुळे दु:ख आहे. पालकमंत्री, आमदारांनी आपापल्या भागांना भेट द्यावी. सरकार हा विषय अत्यंत गांभीर्याने हाताळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या शेतांमध्ये पंचनामा होऊ शकलेला नाही अशाही लोकांना मदत देण्याचा प्रयत्न आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.