साताऱ्यात आज(गुरुवार) दुपारी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच, सर्वत्र धुक्यांसह ढगाळ वातावरण आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. स्ट्रॉबेरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत. याशिवाय आंब्याचा मोहरही झडल्याचे दिसत आहे.

साताऱ्यात मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक भागात सूर्यप्रकाशही नाही. दरम्यान आज दुपारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यापावसाने शेतातील ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. माण तालुक्यातील म्हसवड, खटाव, सातारा, महाबळेश्वर, वाई कोरेगाव तालुक्याही पावसाचा शिडकाव झाला. ढगाळ वातावरण व हलका पावसामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. तर, अनेक ठिकाणी वाऱ्यासह दमदार पाऊस झाल्याने पिकं आडवी झाली आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्याचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली होती. पिकांची अवस्था चांगली असतानाच पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान होणार आहे.

या पावसाचा व प्रतिकूल वातावरणाचा द्राक्ष पिकास फटका बसला आहे. द्राक्षांवर भुरी, घडकुज, दावण्या आदी रोगांचा प्रादुर्भावाची भिती निर्माण झाल्याने फवारण्या करण्याकडे कल वाढला आहे. खटाव तालुक्यातील कलेढोण, मायणी, तरसवाडी, पाचवड, गारळेवाडी, मुळीकवाडी, हिवरवाडी, विखळे, शिंदेवाडी (कलेढोण), कानकात्रे, अनफळे उत्तर कोरेगाव परिसरातील बहुतांशी शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतात. मात्र गेल्या काही दिवसापासून या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, सातत्याने बदलणारे हवामान, ढगाळ वातावरण, धुके, कडाक्‍याची थंडी आदी संकटाना सामोरे जावे लागत आहे.