आमदार संजय कदम यांची खेळी

दापोली नगरपंचायत निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर नाराज शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीचा आश्रय घेण्यास सुरुवात केली असून, राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांची ही फोडाफोडीची रणनीती पुढील विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ‘आऊटगोइंग’ने माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनाही शह मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीत अतिशय कमी फरकाने निवडून आलेल्या आमदार संजय कदम यांनी सुरुवातीपासूनच मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मंडणगड नगरपंचायत निवडणुकीतील यश त्याच मोच्रेबांधणीचे फलित होते. येथे सूर्यकांत दळवी यांच्यासह रामदास कदम यांनी लावलेल्या फिल्डिंगचा संजय कदम यांनी अक्षरश: धुव्वा उडवला. त्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत चिरंजीव योगेश कदम यांना

उतरविण्याचे जाहीर करत त्या दिशेने आक्रमक प्रचार सुरू केला. त्यामुळे संजय कदम यांनी अधिक वेगाने हालचाली करत फोडाफोडीचे राजकारण सुरू केले. त्यात शिवसेनेतील नाराज नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. त्यात सर्वप्रथम सूर्यकांत दळवी यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे नगरसेवक खालिद रखांगे राष्ट्रवादीच्या गळाला लागले. त्यानंतर गेली अनेक वष्रे शिवसेनेत डावलले गेलेले माजी उपनगराध्यक्ष भाऊ तांबे यांनीही आता राष्ट्रवादीच्या तंबूचा आश्रय घेतला.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भाई जगताप यांनी राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचे जाहीर करत आता संजय कदम यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार आघाडीची समन्वय समिती नियुक्त करून जागावाटपाचा निर्णय घेण्यात येणार आहे. या आघाडीमुळे निवडणुकांची स्वतंत्रपणे तयारी करणाऱ्या शिवसेना आणि भाजपला साहजिकच शह मिळाला आहे. सध्या विरोधकांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती राष्ट्रवादीच्या दृष्टीने अनुकूल ठरत असून संजय कदम दापोलीमध्ये मंडणगडची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.