कोल्हापूरसाठी नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी नगरविकास विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या प्राधिकरणामध्ये ४२ गावांचा समावेश असून त्यामधून गोकुळ शिरगाव, एमआयडीसी या औद्योगिक वसाहती वगळण्यात आल्या आहेत. या प्राधिकरणाला ग्रामीण भागाचा विरोध होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहर आणि सभोवतालच्या ४२ गावांच्या विकासासाठी स्थानिकांना कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची आस लागली होती. पावसाळी अधिवेशनात या प्राधिकरणावर मोहोर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यासाठी पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न चालवले होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आकाराला येणाऱ्या प्राधिकरणामुळे कोल्हापूर शहरातील रेंगाळलेल्या कामांना गती आणि कोणत्याही योजनेशिवाय वाढत चाललेल्या ग्रामीण भागातील विकासाला आकार मिळणार मिळण्याची अपेक्षा आहे.