काही केंद्रांवर स्थानिक विरुद्ध बाहेरचे वाद वाई : लशींच्या पुरवठ्याअभावी मंदावलेली साताऱ्यातील लसीकरण मोहीम सोमवारी हा पुरवठा पूर्ववत होताच पुन्हा सुरू झाली. लस आल्यामुळे अनेक केंद्रांवर ती घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या वेळी काही केंद्रांवर स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा वाद रंगला होता. जिल्ह्यात लशीचा साठा संपल्याने गेले काही दिवस जिल्ह्यायातील लसीकरण मोहीम बंद होती. लस उपलब्ध झाल्याने सोमवारपासून ही मोहीम पुन्हा सुरू झाली. आज सकाळपासून जिल्हा रुग्णालयासह जिल्हा उप रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व उपकेंद्रे अशा जिल्ह्यातील एकशे पन्नास ठिकाणी लसीकरण पुन्हा सुरू झाले. लस उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. करोनाच्या भीतीने गावोगावी नागरिक लस मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे लसीकरणासाठी एकदमच मोठी गर्दी झाली. लसीकरण केंद्राबाहेर मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्या. या रांगेत आजूबाजूच्या शहरातील व गावातील नागरिक मोठ्या संख्येने असल्याचे दिसून आले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. आमच्या गावच्या रुग्णालयात आम्हालाच लस मिळाली पाहिजे अन्यथा कोणालाच लस घेऊ देणार नाही असा पवित्रा जिल्ह्यातील अनेक गावांनी घेतला. अनेक केंद्रावर आज ग्रामस्थांनी लसीकरण रोखून धरले. बाहेर गावच्या लोकांना लस देण्यास विरोध दर्शविला. यानंतर गावातल्या लोकांची यादी करून रुग्णालय प्रशासनाकडे दिली. गावचे लोक झाल्यावर बाहेरच्यांना लस द्या असा आग्रह धरण्यात आला. दरम्यान वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केल्यावर काही ठिकाणीच सौम्य भूमिका घेतली. यामुळे आज केंद्राच्या आजूबाजूच्या गावच्या नागरिकांना लस उपलब्ध होऊ शकली नाही. २७ हजार डोस उपलब्ध रविवारी रात्री साताऱ्याला २६ हजार ९१० डोस उपलब्ध झाल्याने लसीकरण पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. यामध्ये सुरुवातीला लसीकरण सत्रांची संख्या ४४७ होती. सध्या लशीचा तुटवडा जाणवत असल्याने जिल्ह्यात सध्या दीडशे लसीकरण सत्रांची संख्या ठेवण्यात आली आहे.