करोना लसीकरण युद्ध पातळीवर सुरू असतानाच जिल्ह््यातील काही लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे फलक लावण्यात आले. ज्या केंद्राकडे लस उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्या (गुरुवारी) दुपारपर्यंत लसीकरण होईल असे  जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले. पाच दिवसांपूर्वी दोन लाख लसची मागणी केली असता केवळ ५० हजार डोस उपलब्ध झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह््यात २२२ लसीकरण केंद्रावर करोना प्रतिबंधक लस देण्यात येत असून मंगळवारअखेर २ लाख ४४ हजार ८८६ जणांनी लस टोचून घेतली आहे. दररोज सुमारे १८ हजार लाभार्थी लसीकरणासाठी येत असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, आरोग्य विभागाकडे बुधवारी केवळ १५ हजार लाभार्थींना देता येईल एवढाच साठा उपलब्ध होता. यामुळे काही केंद्रावर आज दुपारीच हा साठा संपल्याचे चित्र आहे. मिरज तालुक्यातील नांद्रे येथे लस उपलब्ध नसल्याचे लसीकरण होणार नसल्याचे फलक आज दुपारी लावण्यात आला.

करोना प्रतिबंधक लसचे आणखी डोस उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू असून जर पुरवठा निश्चिात झाला, तर लस सांगलीत तत्काळ सांगलीत आणण्यासाठी शीतगृह असलेले वाहन आणि चालक सज्ज ठेवण्यात आल्याचे डॉ. पोरे यांनी सांगितले. लस उपलब्ध करण्याबाबत सायंकाळी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांशी दूरचित्रभाष्यच्या माध्यमातून संवाद साधला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

साताऱ्यातही साठा संपला; लसीकरण मोहीम बंद

वाई : लशीचा सातारा जिल्ह््यातील साठा बुधवारी संपला. या मुळे येथे सुरू असलेली लसीकरण मोहीम थांबवावी लागत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण दोन लाख ५६ हजार ४३४ एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्य:स्थितीत लशीचा साठा संपलेला असल्यामुळे  लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहीम थांबवावी लागत असल्याचे गौडा यांनी सांगितले.