दैनंदिन प्रवाशांना, पासधारकांना प्रवेश नसल्याने संताप पालघर : मुंबई ते वलसाड दरम्यान धावणारी व हजारो दैनंदिन प्रवाशांचा आधार असणारी वलसाड फास्ट पॅसेंजर ही गाडी १ मार्चपासून पुन्हा सुरू करण्याचे पश्चिम रेल्वेने योजिले आहे. मात्र, ही गाडी पूर्णपणे आरक्षित राहणार असल्याचे घोषित केल्याने दैनंदिन प्रवाशांना तसेच पासधारकांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांत संताप व्यक्त होत आहे. मुंबई येथे कामानिमित्त दररोज ये-जा करणारे पासधारक ३५-४० वर्षांपासून वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीने प्रवास करीत असतात. अकरा डबल-डेकर डबे असणाऱ्या या गाडीच्या प्रत्येक डब्यात किमान चारशे ते पाचशे प्रवासी प्रवास करतात. टाळेबंदी जाहीर झाल्याने ही गाडी बंद झाली होती. जून महिन्यात कोविड स्पेशल म्हणून याच गाडीच्या वेळेत एक मेमु गाडी सोडण्यात येत असे. वलसाड फास्ट पॅसेंजरच्या डबल-डेकर डब्यांची देखभाल दुरुस्ती तसेच नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याचे कारण पश्चिम रेल्वे पुढे करत होती व त्यामुळे ही गाडी कायमची बंद केली जाईल अशी भीती येथील प्रवाशांमध्ये होती. पश्चिम रेल्वेने २४ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकात १ मार्चपासून सुरू होणारी वलसाड फास्ट पॅसेंजरऐवजी एक विशेष अतिरिक्त गाडी सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही विशेष सेवा फक्त आरक्षित प्रवाशांसाठी उपलब्ध राहील असे पश्चिम रेल्वेने या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान अशी गाडी सर्वसामान्य प्रवाशांसाठी, अत्यावश्यक सेवेतील व पास धारकांसाठी उपलब्ध रहावी अशी मागणी विविध प्रवासी संघटनांनी पश्चिाम रेल्वेकडे केली आहे. याबाबत प्रवासी संघटनांनी पश्चिम रेल्वेकडे या संदर्भात निवेदन दिले आहे. गाडीचे वेळापत्रक मुंबई ते वलसाड ही गाडी सकाळी ४.४० वाजता व वलसाडहुन सुटून ९.१५ वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाला सायंकाळी ६.१० वाजता ही गाडी सुटणार असून १९४ किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी चार तास ३५ मिनिटे ते चार तास ५५ मिनिटात इतका वेळ घेणे अपेक्षित आहे.