मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्वांच्या सहभागानं पायाभरणी होणार असल्याचं सांगितलं आहे. यासंबंधी त्यांनी निर्देशही दिले. परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला या पुतळ्याला विरोध असून ते पैसे कोविडसाठी खर्च करावे, असं म्हटलं आहे. "मी यापूर्वीपासून सांगतोय की पुतळ्याला माझा विरोध आहे. पुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं. आज त्याची अधिक गरज आहे. हा पैसा त्यासाठी वापरला तर अजून अनेकांचे जीव वाचवण्यास आपल्याला मदत होईल. करोनातून लोकांना वाचवणं ही सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे पुतळ्यावर खर्च करण्याऐवजी तो निधी करोनासाठी खर्च करावा," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. झी चोवीस तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा आंतरराष्ट्रीय केंद्रासाठी दिली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पत्राचं अध्ययन मुख्यमंत्र्यांनी करावं," असंही त्यांनी नमूद केलं. आणखी वाचा- “इंदू मिलची जागा मोदींमुळेच मिळाली, पायाभरणी कार्यक्रम लपूनछपून का?” पुतळ्याचं उद्घाटन यापूर्वीही झालं होतं. त्यामुळे पुन्हा उद्धाटनाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. सकाळपर्यंत मला त्याची जाणीव नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवून याचा निर्णय घ्यावा. इंदू मिलची जागा कशासाठी वापरावी, का वापरावी आणि त्याची देशाला गरज काय आहे, त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का द्यावं याची नोट अटल बिहारी वाजपेयी यांची आहे ती मुख्यमंत्र्यांनी वाचावी. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय केंद्र उभारावं. त्यासाठी सरकारवर कोणताही आर्थिक बोजा नाही. त्यासाठी लागणारा खर्च केंद्र सरकार देणार," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुतळ्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण जरी आलं तरी आपण त्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुतळ्याची गरज नाही. त्या नोटमधील संकल्पना गरजेची आहे असं मानत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आणखी वाचा- इंदू मिलवरुन राजकारण करू नये, उद्धव ठाकरेंचं आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: म्हणत होते. आपल्याला पुतळ्यांची गरज नाही माणसाची गरज आहे. आपल्याला विचारसरणीची गरज आहे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ही मानत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.