प्रशांत देशमुख वर्धा : नागपूर‑तुळजापूर या सहा पदरी मार्गावर गांधी हिंदी विद्यापिठापुढे मोठा पूल आहे. या एक किलोमीटर लांबीच्या पूलावर अर्ध्या भागात पाणी साचण्याची बाब गंभीर ठरली होती. या मार्गावरून सावंगीच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाणाऱ्या अनेक डॉक्टरांना साचलेल्या पाण्यामुळे अडचणी उद्भवत असल्याची बाब 'लोकसत्ता'ने निदर्शनास आणली होती. साचलेल्या पाण्यामुळे गाड्या बंद पडत असून अपघातही होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत खासदार रामदास तडस यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना याचा जाब विचारत त्वरित दुरूस्ती करण्याची सूचना केली होती. त्यानंतर महामार्गावरील पूलावर पाणी साचण्याची गंभीर त्रूटी अखेर दुरूस्त करण्यात आली असून हा मार्ग पूर्ववत आता खुला झाला आहे. आज वर्धेत संपन्न राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत या समस्येवर विचारणा झाल्यावर प्रकल्प संचालक मेंढे यांनी दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याचे उत्तर दिले. भविष्यात ही समस्या राहणार नसल्याची खात्रीही त्यांनी खा. तडस यांना या बैठकीत दिली. याशिवाय राष्ट्रीय महामार्गावरील पवनार येथे प्रस्तावित पादचारी पूल, शेडगाव चौरस्ता येथील अपघातप्रवण स्थळाची दुरूस्ती, जाम चौरस्ता येथील प्रस्तावित विकासकाम, नांदगाव चौरस्ता येथील उड्डाण पूल, पूलगाव‑कारंजा‑जालना या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे नुतनीकरण, कारंजा येथे मंजूर उड्डाण पूलाच्या कामाला प्रारंभ अशा व अन्य विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विविध महामार्गाच्या कामांना चालना दिली आहे. या कामांचा आढावा घेवून प्राधिकरणाच्या दिल्ली मुख्यालयातील बैठकीत त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक असते. ही बाब लक्षात ठेवून या कामांचे नियोजन करावे व लेखी स्वरूपात आराखडा सादर करावा, अशा सुचना खा. तडस यांनी या बैठकीत केल्या.