करोनामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून करोनामुळे बंद असलेल्या लोकल ट्रेनचा फटका वसईच्या शेकडो फूल शेतकऱ्यांना बसला आहे. दररोज सकाळी पहिल्या लोकलने वसईची फुले विक्रीसाठी मुंबईच्या बाजारात दाखल होत होती. मात्र आता रेल्वेसेवा बंद असल्याने शेतकऱ्यांना फुले खासगी वाहनाने मुंबईत न्यावी लागत आहेत. कामगारांचे पगार तसेच वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने वसईचा फुलशेतकरी संकटात सापडला आहे.

सदाफुली, जास्वंद, सोनचाफा, झेंडू, तागर, मोगरा अशा विविध फुलांचे बारा महिने वसईत शेती केली जात असून छोटे-मोठे असे पाचशेहून अधिक शेतकरी फूल व्यवसायात आहेत. लॉकडाऊनमुळे फुले अनेक महिने झाडावरच कोमजली होती मात्र आता व्यवहार सुरळीत झाले असले तरी रेल्वेसेवा सुरळीत होण्यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शासनाने  नियम पाळून लोकलमधून मालवाहतुकीसाठी फूल व्यावसायिकांना मुभा द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

शिवाय या व्यवसायावर पोट असलेले कामगार यात भरडले जात असून त्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. काढलेली फुले जर न परवडणाऱ्या खर्चामुळे शेतातच पडून असतील तर आमचे पोट कसे भरणार असे मत त्यांच्या कडून व्यक्त केले जात आहे.

करोनामुळे फक्त अत्यावश्यक सेवेसाठी रेल्वे सेवा ही खुली आहे. मात्र या ट्रेनमध्ये गर्दीचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे लोकलमध्ये करोनाचा संसर्ग होत नाही का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असून रेल्वे पुन्हा कधी सुरळीत होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

– किरण पाटील, फुलशेतकरी