वसईतील पंचायत समितीच्या कार्यलयाची मागील काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयाच्या भिंतीना अनेक ठिकाणी तडे गेले असून काही ठिकाणी काँक्रीट निखळून खाली पडले आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून येथील कर्मचारी वर्ग व कामासाठी येणाऱ्या नागरिकांना राहावे लागत आहे. वसई पश्चिमेतील तहसीलदार कार्यालयाच्या समोरच पंचायत समितीचे मुख्य कार्यालय आहे. हे कार्यालय २ हजार ९८८ चौरस मीटर क्षेत्रात विस्तारले आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य , पशुसंवर्धन, कृषी, ग्रामीण रोजगार, स्वच्छता, गटविकास अधिकारी यांचे कार्यालय, लघुपाटबंधारे, पाणी पुरवठा, खादी ग्रामउद्योग अशा विविध प्रकारचे विभाग आहेत. त्यातून विविध क्षेत्रातील कामकाज चालते. त्यामुळे दररोज मोठय़ा संख्येने नागरिक विविध प्रकारच्या कामासाठी या कार्यलयात येत असतात. परंतु सध्या पंचायत समितीच्या कार्यालय हे धोकादायक स्थितीत असल्याचे चित्र दिसून आले आहे. इमारत उभारून अनेक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. इमारतीत असलेल्या अनेक ठिकाणच्या विभागातील कार्यालयांच्या भिंतींना तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंतीवरील प्लास्टर ही निखळून खाली पडले आहे. स्लॅब कोसळून खाली पडल्याने त्यातील सळ्या सुद्धा आता बाहेर दिसू लागल्या आहेत. मध्यंतरी या इमारतीची दोन ते तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली होती.परंतु जसजसे बांधकाम जुने होत आहे तशी ही इमारत अधिकच धोकादायक बनू लागली आहे. इमारत धोकादायक असल्याचा निर्वाळा बांधकाम विभागाने या इमारतीचे लेखा परीक्षणही केले आहे. त्यामध्ये ही इमारत धोकादायक असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. अशा धोकादायक असलेल्या इमारतीत विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. जर एखादी दुर्घटना घडली तर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी पंचायत समितीच्या धोकादायक असलेल्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. पंचायत समितीचे कार्यालय धोकादायक असल्याने त्याचे नूतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. - एस.एम शिंदे, प्रभारी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग