संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. यशवंत पाठक यांनी मराठी आणि संस्कृत विषयात एमए केले होते. संत साहित्याचे अभ्यासक म्हणून ते ओळखले जायचे. त्यांनी २५ हून अधिक पुस्तके लिहिली असून विविध गौरव ग्रंथांमध्ये त्यांचे संशोधन लेखनही प्रसिद्ध झाले होते. नाचू किर्तनाचे रंगी (प्रबंध), अंगणातले आभाळ (आत्मकथन), येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ, निरंजनाचे माहेर या चार पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील मिळाले होते. त्यांनी मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिराच्या महाविद्यालयात ३५ वर्षे अध्यापन केले होते. कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठातून १९७८ पी.एचडी केले. या शिवाय डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार, संत ज्ञानदेव पुरस्कार, संत विष्णुदास कवी पुरस्कार, चतुरंग पुरस्कार अशा पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शनिवारी पहाटे यशवंत पाठक यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांची प्राणज्योत मालवली.