तीन जण जखमी; शिकार करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याने संताप

शिकारीसाठी जंगलात गेलेल्या पाच जणांना वनविभागाने ताब्यात घेतल्याने संतप्त झालेल्या बेलकडी ग्रामस्थांनी वसईतील वनखात्याच्या कार्यालयावर हल्लाबोल करत नासधूस केली. या हल्लय़ात वनविभागाचे ३ कर्मचारी जखमी झाले आहेत.

बुधवारी वनखात्याचे पथक वसईच्या कामण येथील जंगतात गस्त घातलत असताना पाच जण संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन गोखिवरे येथील वनखात्याच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे शिकारीचे साहित्य आणि सुतळी बॉम्ब आढळून आला. हे पाचही जण वसई पूवेच्या बेलकडी येथील रहिवासी आहेत. त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त गावात पसरतात दोनशेहून अधिक जणांच्या समूहाने गोखिवरे येथील वनखात्याच्या कार्यालावर धडक देत हल्ला केला. त्यांनी वन विभागाच्या कार्यालयाची मोडतोड करत कार्यालयातील लॅपटॉप, संगणक, खिडक्यांच्या काचा, फलक यांची नासधूस केली. यामध्ये दोन वनमजूर, एक वनरक्षक आणि वनअधिकारी हे जखमी झाले असून त्यातील एक वनमजूर गंभीर जखमी झाल्याचे तुंगारेश्वर अभयारण्याचे वनविभाग अधिकारी  नरेंद्र मुठे यांनी सांगितले. वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवले. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.