आपल्या अणकुचीदार काटय़ांनी पाहणाऱ्याच्या अंगावर काटे आणणारा आणि निसर्गसाखळीत अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा लालबोंडय़ा निवडुंग (ओपनशिया) अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातून तो हद्दपार होण्याची शक्यता शक्यता आहे.डोंगराळ पठारी प्रदेशात कित्येक दिवस पाण्याशिवाय वाढणाऱ्या निवडुंगात औषधी गुणधर्म असल्याने ती अनेक आयुर्वेदिक औषधांसाठीही उपयुक्त ठरते. ब्रिटिश राजवटीत या वनस्पतीवर पाने पोखरणाऱ्या किडीने मोठय़ा प्रमाणात कब्जा केल्याचे आजही जाणकार सांगतात. एकदा किडीची लागण झाली, की साधारण एका वर्षांतच ही झाडे वाळून जाऊन नामशेष होत आहेत. ही कीड वेळीच रोखली न गेल्यास ही दुर्मिळ वनस्पती कायमची नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उपयुक्त की हानीकारक?लालबोंडय़ाचे मूळ भारतीय नाही. तरीही तो उष्ण वातावरणात मोठय़ा प्रमाणात फोफावला आहे, अमेरिकेच्या काही भागातही त्याने मोठय़ा प्रदेशावर हातपाय पसरले आहे. आता मात्र त्याच्यावरील किडीमुळे तो तिकडेही मृत्युपंथाला लागला आहे. हा निवडुंग औषधी गुणधर्मामुळे उपयुक्त असल्याचे मानले जाते, पण तो आपल्याकडे तणासारखा वाढत असल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने हानीकारक असल्याचेही काही तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे त्याला नष्ट होताना थांबवायचे की त्याचे उच्चाटन करायचे, याबाबत संभ्रम आहे.