महाराष्ट्रामध्ये कोव्हिडचा मृत्यूतांडव सुरु आहे, अशा शब्दांमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विरारमधील घटनेनंतर बोलताना म्हटलं आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत या रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याचसंदर्भात ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत सोमय्या यांनी सध्याची परिस्थिती पाहता ठाकरे सरकारने प्रतिष्ठेचा मुद्दा बाजूला ठेऊन केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे असंही मत व्यक्त केलं आहे. तसेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केलीय.

“महाराष्ट्रात कोव्हिड मृत्यूतांडव सुरु आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोव्हिड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवलं पाहिजे,” असं मत सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.


फडणवीस म्हणतात…

देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरुन विरारमधील घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिलीय. “आणखीन एक धक्कादायक घटना. विरारमधील कोव्हिड रुग्णालयामधील आयसीयूला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याचं समल्याने खूप दु:ख झालं आहे. माझ्या सद्भभावना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. करोना रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आमची मागणी असून यासाठी कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

एसीचा स्फोट झाल्याने आग

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेलेली आग ही एसीचा स्फोट झाल्याने लागली असल्याची माहिती डॉक्टर दिलीप शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रुग्णालयात सेंट्रलाइज एसी असून दोनच मिनिटात आग सगळीकडे पसरली अशी माहिती त्यांनी दिली आहे. रात्री ३ वाजता लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात धावपळ सुरु झाली होती. आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. यामधील चौघे जण जे चालू शकत होते त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली. मात्र इतर रुग्ण आपला जीव वाचवू शकले नाहीत आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. आगाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले होते. घटनास्थळी पोहचल्यानंतर काही वेळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.

इतर रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलं

रुग्णालयात एकूण ९० रुग्ण दाखल होते. आग लागल्यानंतर ऑक्सिजनवर असणाऱ्या तसंच गंभीर प्रकृती असणाऱ्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. २१ रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं असून यामध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.