कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ठरणार आहे. यासंदर्भातली अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. संबंधित पोलीस ठाण्यांना तसे कळवले जाणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली. दर महिन्याला राज्यातील सर्व जिल्ह्यांत महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनेक जाती आणि जमातींमध्ये विवाहानंतर मुलीचे कौमार्य चाचणी करण्याची प्रथा आहे. कंजारभाट समाजातील अनेक मुलींना या चाचणीला सामोरे जावे लागते. या संदर्भातल्या काही बातम्याही समोर आल्या होत्या. यानंतर अशा घटनांना आळा बसावा म्हणून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच जात पंचायतीविरोधी समितीचे सदस्य आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.
या बैठकीत या संबंधीची चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला.

कौमार्य चाचणी स्त्रियांसाठी अपमानजनक आहे. ही चाचणी घेणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली. या बैठकीला गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात अशा घटना घडू नयेत आणि घडल्यास संबधितांवर गुन्हा नोंदवण्यात यावा अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.