“वारीस पठाण यांनी केलेले वक्तव्य हे धमकी वजा आहे. त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदूना धमकावल्याच त्याचा चांगला परिणाम होणार नाही,” असे सडेतोड उत्तर विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी पठाण यांना दिले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त व्क्तव्य केलं होतं. या सभेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेनं वारिस पठाण यांच्या टीका केली आहे.

आणखी वाचा – माफी मागणार नाही, संविधानात राहून बोललोय – वारिस पठाण

काय म्हणाले होते वारिस पठाण?

सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू,” असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते. १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

आणखी वाचा – लक्षात ठेवा! १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत; ‘एमआयएम’च्या नेत्याचे बेताल वक्तव्य

विश्व हिंदू परिषदेचे उत्तर

पठाण यांच्यावर चहूबाजूने टिका होत असतानाच आता विश्व हिंदू परिषदेनेही याप्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परिषदेचे मिलिंद परांडे यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. “त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदुना धमकावून परिणाम होणार नाही. इतिहास काळापासून जे काही हिंदू समाजावर संकट आली आहेत. त्याची हिंदू समाज चिंता करायला सक्षम आहे,” असा थेट इशाराच परांडे यांनी वारीस पठाण यांना दिला.