राज्यपाल, मुख्यमंत्रीविरोधी घोषणा; वडेट्टीवारांचे धरणे आंदोलन महाराष्ट्राच्या हद्दीत मुख्यमंत्री, राज्यपाल व पालकमंत्र्यांविरोधात निषेध आणि मुर्दाबादच्या तीव्र घोषणांचा निनाद व काळे झेंडे दाखवित आंदोलन सुरू असतांनाच तिकडे महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागात गोदावरी नदीवर कालेश्वरम-मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाचे भूमिपूजन अखेर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे हस्ते करणत आले. सिरोंचा तालुक्यातील २३ गावे बुडविण्याचा निर्णय पालकमंत्री अंबरीश आत्राम यांनी घेतला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे विधीमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनादरम्यान केला. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गोदावरीच्या पात्रात कालेश्वरम-मेडीकट्टा सिंचन प्रकल्पाला गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत दोन्ही राज्यांचा सामंजस्य करार झाला तेव्हापासून या प्रकल्पाला सिरोंचा तालुक्यातील भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोध केला. मात्र, तेव्हा संपूर्ण अभ्यासानंतरच या प्रकल्पाचे काम सुरू केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात तसे न होता तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी प्रकल्पाचे भूमिपूजनही केले. आज सकाळी चंद्रशेखर राव यांनी कालेश्वरमच्या मंदिरात सपत्नीक पूजा केली व प्रथम कन्न्ोपल्ली येथे पंपहाऊसचे व नंतर मेडीगट्टा प्रकल्पाचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांच्यासोबत तेलंगणाचे उपमुख्यमंत्री कडेम श्रीहरी, महसूलमंत्री इटेला राजेंद्रर व जलसंपदा मंत्री हरीश राव उपस्थित होते. तिकडे, हा भूमिपूजन सोहळा रंगलेला असतांनाच महाराष्ट्राच्या हद्दीत कॉंग्रेसचे विधीमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येऊन काळे झेंडे दाखवितांनाच अडीच तास धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, दोन्हा राज्यांचे मुख्यमंत्री, पालकमंत्री अंबरीश आत्राम यांच्याविरोधात मुर्दाबाद व निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पालकमंत्री अंबरीश आत्राम यांनी सिरोंचा तालुक्यातील २३ गावे बुडविण्याचा निर्णय घेतला असल्यामुळेच आज ते प्रकल्पाला विरोध न करता चूप बसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व पालकमंत्री आत्राम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशीही मागणी करण्यात आली. विद्यासागर राव महाराष्ट्राचे राज्यपाल असले तरी सर्व निर्णय तेलंगणाच्या फायद्याचे घेत आहेत. या पदावर काम करतांना असा एकतर्फी निर्णय घेतल्याने लोकांचे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मुर्दाबाद व निषेधाच्या घोषणांच्या निनादातच मेडीगट्टा प्रकल्पाचे भूमिपूजन करून मुख्यमंत्री केसीआर निघूनही गेले. यावेळी वडेट्टीवार यांनी मेडीगट्टा प्रकरणी जनआंदोलन उभारणार असल्याचे सांगितले. आजच्या आंदोलनात माजी आमदार व गडचिरोली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, प्रदेश कॉंग्रेसच्या सचिव सगुणा तलांडी यांच्यासह कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्तेही सहभागी झाले होते. माजी आमदार दीपक आत्राम व आदिवासी विद्यार्थी संघटनेनेही मेडीगट्टा तीव्र आंदोलन केले.