ऑक्सिजन पार्क परिसरात २० वर्षांपूर्वी लावलेल्या एक हजार झाडांचा वर्धापन दिन आज (रविवार) वृक्षांना राखी बांधून साजरा करण्यात आला. ऑक्सिजन पार्क परिसरात २० वर्षांपूर्वी निसर्ग सेवा समिती व स्वयंसेवी संघटनांनी कडूनिंब, रिठा, आंबा, आवळा, बकूळ, पळस, वड, पिंपळ, उंबरसारख्या विविध प्रजातींची रोपं लावली होती. ही वृक्ष आता चांगलीच बहरली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव निर्माण व्हावी. तसेच श्रममुल्याचे बीजारोपण व्हावे म्हणून या वीस वर्षात त्यांचे सहकार्य वृक्षाच्या संगोपणात घेण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले. २०१७ पासून २०२० पर्यत याच परिसरात १५ हजार विविध प्रजातीची रोपं लावण्यात आली आहेत. पर्यावरणपूरक व स्थानिक परिस्थितीशी अनुकूल झाडे लावण्यासाठी जैव विविधता विषयक अभ्यास करून प्रकल्प तयार करण्यात आला होता. प्रकल्प तयार करणारे अर्णव तलमले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे यांनी वृक्षांचा वर्धापनदिन ही अभिनव संकल्पना असल्याचे मत मांडले. या झाडांची पुढील काळात संरक्षण करण्याची जबादारी प्रत्येक वर्धेकराची असल्याचे मत संजय इंगळे तिगावकर यांनी व्यक्त केले. ओशिन शर्मा, स्पृहा राऊत या चिमुकल्यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त पांगाराचे रोपटे लावले. दामोदर राऊत यांनी वृक्षगीत सादर केले. ग्रामसेवा मंडळाचे अतुल शर्मा, खंजेरीवादक भाऊसाहेब थूटे, प्रकाश येंडे, रविंद्र कडू, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, वनविभागाचे उपसंचालक दत्तात्रय जोशी यांच्या हस्ते वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षास जलसिंचन करण्यात येऊन वृक्षांना प्रतिकात्मक राखी बांधण्यात आली.