विलगीकरणाचा कालावधी संपलेल्या कुटुंबात पाच दिवसानंतर करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने, स्थानिक प्रशासन पेचात पडले आहे.

आणखी वाचा- चिंता वाढली! करोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र चीनलाही मागे टाकण्याच्या मार्गावर

दोन दिवसांपूर्वी सर्व वर्धेकर रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज आर्वी तालुक्यातील वर्धे मनेरी या खेड्यातील ५२ वर्षीय पुरुष करोनाबाधीत असल्याचा अहवाल सकाळी आला आहे.  या व्यक्तीचा मुलगा ‘यूपीएससी’ परिक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत होता, तो १९ मे रोजी तर मुलगी नागपुरातून एक महिन्यांपूर्वी गावात आली होती. या नंतर संपूर्ण कुटुंब गृह विलगिकरणात होते, त्यांचा कालावधी १ जून रोजी संपला होता. मात्र घरातील पुरुषास खोकला व अन्य लक्षणे दिसून आल्यावर त्याचे स्वॅब तपासणीस पाठविण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तर निकटच्या तीन व्यक्तीस आर्वी येथील रुग्णालयात अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे, आता जिल्ह्यात एकूण रुग्णाची संख्या नऊ झाली आहे