टाळेबंदीत वाढ केल्याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात फळांची रास ओतून संताप व्यक्त केला. ८ ते १३ मे पर्यंत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधात १८ मे पर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यावर त्याचे सर्वत्र पडसाद उमटल्याचे दिसत आहे.

आर्वीत प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात फळं आणून टाकली. प्रशासनातर्फे कसलेही नियोजन नसून वारंवार लावण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील फळे, भाजीपाला शेतातच सडत आहे. शेतकऱ्यांना न सहन होणारा आर्थिक फटका बसत असल्याने प्रचंड संताप असल्याचे बाळा जगताप यांनी सांगितले.

त्यामुळे आज शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात विविध फळांचा ढीगच रचला. या संतप्त भावनेची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यात रोज सकाळी ११ वाजेपर्यंत शेतकऱ्यांना फळ, भाजीपाला विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय झाला.