अवकाळी पावसाने वर्धा मधील सिंदी रेल्वे महसुल मंडळातील आठ गावातील घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावातील झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी आज राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी केली. पालकमंत्री केदार यांनी चानकी, कोपरा व पिंपळगाव येथील नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. सेलू तालुक्यात 14 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सिंदी रेल्वे महसूल मंडळातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून प्राथमिक अंदाजानुसार चानकी -158, कोपरा-110, हिवरा-20, पिंपळगाव-20, वघाळा-20, टाकळी -6 देऊळगाव-3, दिंदोडा-7 या आठ गावातील 344 घरांचे अंशत: नुकसान झाले असून घराची पत्रे उडाली आहेत. चानकी व कोपरा गावातील नुकसान झालेल्या घरात असलेले धान्य तसेच कापूस ओला झाला. चानकी, कोपरा व पिंपळगाव येथील जनावरे जखमी झाले.