वर्ध्यात प्रवासातील तसेच बाहेरून आलेल्या रुग्णांमुळे करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या रोज वाढत असल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. आता वर्ध्यात नव्याने दाखल झालेल्या झारखंडचे काही लोक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

सूरतमध्ये अडकलेल्या झारखंडमधील कामगारांना घेऊन निघालेल्या श्रमिक रेल्वेतील एका कामगाराची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला वर्ध्यात उपचारांसाठी उतरविण्यात आले होते. मात्र, रुग्णालायत पोहचण्याआधी वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रशासनाने मृत व्यक्ती आणि सोबत असलेल्या नातेवाईकाची करोनाचाचणी केली होती. त्याचा आज अहवाल प्राप्त झाला. यामध्ये मृत व्यक्तीची करोनाचाचणी निगेटिव्ह तर त्याच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांची पॉझिटिव्ह आली आहे.

आणखी वाचा- सोलापुरात नव्या २९ करोनाबाधित रूग्णांची भर; एका महिलेचा मृत्यू

दरम्यान, करोनाबाधित रुग्णाला सावंगीमध्ये पुढील उपचारासाठी भरती करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले. सध्या वर्ध्यामध्ये गोरखपूर-सिकंदराबाद, नवी मुंबई, वाशीम, अमरावती अशा अन्य ठिकाणचे करोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत.