काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आजच्या वर्धा दौऱ्यात आमदार रणजीत कांबळे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी गाऱ्हाणे मांडल्याने प्रदेशाध्यक्षांसमोर पेच निर्माण झाला होता. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले वर्धा जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या भेटीसाठी जिल्हाभरातून काँग्रेस पदाधिकाऱ्यांची गर्दी उसळली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या आगमनास अगोदरच तब्बल तीन तास विलंब झाल्याने, पत्रकारपरिषद आटोपताच नाना पटोले सेवाग्राम आश्रमला भेट देण्यासाठी रवाना झाले. दरम्यान, विश्रामगृहावर उपस्थित असलेले आमदार रणजीत कांबळे यांची पटोलेंशी भेट झालीच नाही. तर, त्यांच्या विरोधकांनी पटोलेंभोवती गर्दी केला होता. विश्रामगृहावर भेट शक्य न झाल्याने पदाधिकारी पटोलेंपाठोपाठ सेवाग्रामला पोहोचले. आश्रमातील भेट आटोपल्यावर माजी आमदार अमर काळे, प्रदेश सचिव शेखर शेंडे, माजी नगराध्यक्ष इंद्रकुमार सराफ, माजी नियोजन मंडळ सदस्य प्रमोद हिवाळे, प्रवीण हिवरे, राजू शर्मा, सलिम कुरेशी, इक्राम हुसेन यांनी प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधला. निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यांना पदोपदी डावललं जात आहे. पक्षीय कार्यक्रमात व संघटनेत सहभागी करून घेतलं जात नाही. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केल्या जात आहे. असं सांगत, काँग्रेसशी निष्ठा राखण्याचे हेच फळ मिळणार कां? असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना केला. तसेच, किमान जिल्हा कार्यकारिणीत तरी निष्ठावंतांना स्थान मिळावे, असा आग्रह देखील यावेळी धरण्यात आला. त्यावर पटोले यांनी आर्वी मतदारसंघात अमर काळे व वर्धा मतदारसंघात शेखर शेंडे यांनी नावे सुचवावी. त्या नावांना निश्चित स्थान मिळेल, अशी हमी दिली. यावेळी उपस्थित पक्षनेते रवींद्र दरेकर यांनीही उपस्थित नेते अनेक वर्षांपासून काँगेससाठी कार्य करीत असल्याची पावती दिली. प्रदेशाध्यक्षांकडून न्याय मिळण्याची आशा असल्याचे मत शेखर शेंडे यांनी व्यक्त केले.