जिल्हा करोनामुक्त ठेवण्यासाठी गृह विलगीकरणात असणाऱ्या सात हजारावर कुटुंबांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘घरातच रहा, करोना योध्दा व्हा’ या एकदिवसीय अभियानाचे आयोजन १८ मे रोजी केले आहे. जिल्हा करोनामुक्त ठेवण्यासाठी गृह विलगीकरणात असणाऱ्या सात हजारावर कुटुंबांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘घरातच रहा, करोना योध्दा व्हा’ या एकदिवसीय अभियानाचे आयोजन १८ मे रोजी केले आहे.  या अनोख्या अशा अभियानाचे नेतृत्व जिल्हाधिकारी विवेक भीमनवार हे करीत असून, त्यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी विलगीकरणातील कुटुंबांना भेट देणार आहेत.

बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या एका रूग्णामूळे हरित पट्ट्यातून केशरी पट्ट्यात घसरलेल्या वर्धा जिल्ह्यात प्रवासाची परवानगी दिल्यानंतर करोनाबाधीत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. तसेच, शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येते. पर्यायानुसार संस्थात्मक विलगीकरणात न ठेवता सोयीनुसार संपूर्ण परिवारासहीत गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र तरीही काही नागरिकांचा घराबाहेर पडून सार्वजनिक वावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यात चुकून एखादी व्यक्ती जरी बाधीत निघाल्यास सामुदायीक प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता, जनजागृतीचा निर्णय घेण्यात आला.

सद्यस्थितीत घरात राहणे हे सुध्दा करोना योध्द्याचे कर्तव्य पार पाडल्यासारखेच आहे. त्यामुळे प्रशासनाचे काम कमी होण्यास मदत होते. या भूमिकेतून १८ मे रोजी अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विलगीकरणातील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यासाठी आयोजित या मोहिमेत सुजाण नागरिकांनी सुध्दा सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील ७ हजार २४० कुटुंबाच्या घरी हा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे.