वर्धा येथील समुद्रपूर तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन बालकांचा विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याचे समोर आले आहे.

तालुक्यातील मांगली या गावातील अमोल उईके यांचा नऊ वर्षीय मुलगा बुधवारी आकाश गावातील मंदिरात खेळत होता. सायंकाळी पाच वाजता खेळून बाहेर निघत असतांना, त्याचा एका आर्थिंगच्या तारेस स्पर्श झाल्याने तो जागेवरच पडला. ही बाब लक्षात आल्यावर त्याला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तर, दुसऱ्या एका घटनेत प्रशांत भोयर यांची मुलं हर्षल व गणेश घरात खेळत होते. दरम्यान प्रशात हे स्नान करण्यास गेलेले असताना व त्यांची पत्नी स्वयंपाकात असतांना त्यांना गणेशच्या ओरडण्याचा आवाज आला. यावर दोघेही पती-पत्नी धावत आले असता त्यांना हर्षल (६ वर्षे) हा कुलरला चिकटून पडल्याचे त्यांना दिसले. कुलरच्या टपात ठेवलेली लोणच्याची बरणी काढत असतांना त्याला विजेचा धक्का लागल्याचे समोर आले. यावर त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडे या घटनेची नोंद झाली आहे.