वाघाच्या हल्ल्यात एक गावकरी ठार झाला असतांनाच एका बेपत्ता इसमाचा मृतदेह जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

वर्धा जिल्ह्यातील कारंजा वन क्षेत्रात राहती परिसरात नांदोरा येथील मुकुंदा हिरामण धोटे हे पत्नीसह तेंदूपत्ता वेचण्यासाठी जंगलात गेले होते. त्याचवेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यात ते ठार झाले, तर दुसऱ्या एका घटनेत दीड महिन्यापासून बेपत्ता असलेले रामदास नारायण भगत (वय-७३) यांचा देह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

आज आष्टी वन क्षेत्रातील सुजातपुरचे गावकरी या परिसरात असतांना त्यांना भगत यांची सायकल आढळून आली, त्याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर गावकरी व वन कर्मचारी पाहणी करत फिरले, त्यात सदर व्यक्तीचे रक्ताने माखलेले कपडे, चप्पल, कुऱ्हाड, आधार कार्ड व शरीराचे कुजलेल्या अवस्थेतील अवयव दिसून आले. ही घटना हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्याची की अन्य स्वरूपातील याचा तपास सुरू आहे.