कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून येत्या ४८ तासांत हे वादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सोमवारी पहाटे अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. अशातच प्रादेशिक हवामान विभागाकडून दुपारनंतर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोकण किनारपट्टीवर तयार झालेले चक्रीवादळ ३ जूनला रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर ते दमण दरम्यानच्या परिसरात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वयित करण्यात आल्या आहेत. मच्छीमारांना खोल समुद्रात जाण्यास निर्बंध घालण्यात आले. तर किनारपट्टीवरील गावांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) एक पथक मुरुड येथे दाखल झाले आहे. स्थानिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ  नये अशा सुचनाही देण्यात आल्या आहते. आपत्कालिन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ अथवा १०९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘वादळाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील आपत्ती यंत्रणा कार्यान्वयित करण्यात आल्या आहेत. कच्च्या घरात राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ  नये. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊ न ३ जूनला जनता कर्फ्यू पाळावा आणि नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे.’

– निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड.

चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी रत्नागिरीत एनडीआरएफची तुकडी

कोकण किनारपट्टीवरून मुंबई-गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा दलाची (एनडीआरएफ) तुकडी मागवली असून सर्वत्र सावधगिरीचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे ‘निसर्ग’ या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. गुजरातच्या दिशेने जाणारे हे वादळ आज मंगळवारी कोकण किनारपट्टीवरून पुढे जाण्याची शक्यता आहे. यावेळी मुसळधार पावसाची शक्यता असून वाऱ्यांचा वेगही काही वेळा ताशी ८० किलोमीटर इतका असू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे कोकण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ  शकते. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष सतर्क झाला असून आपत्तीच्या काळातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. २६ जवानांची ही तुकडी चिपळूणला सज्ज ठेवण्यात येणार आहे.

या वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांसह किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रविवारपासून जिल्ह्यात विस्तृत प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणातील या बदलामुळे जिल्ह्यातील तापमानही घसरले आहे.