कमी पर्जन्यामुळे चालू वर्षी राज्यात सर्वत्र अभूतपूर्व अशी पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीलाही सामोरे जाण्यासाठी राज्यातील जनतेमध्ये पाणी वापराबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याअंतर्गत प्रतिवर्षी १६ ते २२ मार्च या कालावधीत संपूर्ण राज्यात जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे पहिले पाऊल म्हणून २२ मार्च २०१६ रोजीच्या जागतिक जल दिनाचे औचित्य साधून १६ ते २२ मार्च २०१६ या कालावधीत जलसंपदा विभागाच्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत कोकण पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी यांच्या नियंत्रणाखाली रत्नागिरी जिल्हय़ात हा जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये १६ मार्च ते २२ मार्च २०१६ या कालावधीत जलजागृतीच्या संबंधित विविध उपक्रम जसे जिल्हय़ातील प्रमुख नद्यांचे जल कलश पूजन, जल प्रतिज्ञा सामूहिक वाचन, लाभधारक ग्रामस्थ यांच्यासमवेत मेळावे, व्याख्याने, पाणीबचतीबाबत प्रबोधनपर व्याख्याने, घोषवाक्ये बॅनर्स लावणे, वॉटर रन आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या हस्ते १६ मार्च २०१६ रोजी आयोजित केले आहे.

या जलजागृती सप्ताह कार्यक्रमामध्ये शासनाचे सर्व विभाग या जलजागृती सप्ताहात सहभागी होऊन जलजागृतीच्या संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. त्यामध्ये शिक्षण विभागाकडून तालुका/ जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच कृषी विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा उद्योग, एम.आय.डी.सी., जलसंपदा, ग्रामीण पाणीपुरवठा इ. विभागांनी पाण्याचे महत्त्व व काटकसरीने पाणी वापर ही काळाची गरज यासंबंधित जनजागृती करण्यात येणार आहे.

शासनाची ही जलजागृती सप्ताह मोहीम पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने, पाण्याचे महत्त्व जनसामान्यांना कळण्यासाठी एका सामाजिक जल चळवळीची नांदी आहे. या चळवळीत, अभियानात सर्व प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधी, सर्व जनता यांचे सहकार्य, सहभाग व योगदानातून हा जलजागृती सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.