यंदा देशभरात मान्सूनचा पाऊस उत्तम पडण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला असला तरी कोकणात अजून तो पोचला नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पाणी टंचाईने उग्र स्वरूप धारण केले असून ग्रामीण भागाबरोबरच काही शहरांमध्येही त्यांच्या झळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या जिल्ह्याच्या सर्व, नऊही तालुक्यांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत जास्त पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच गेल्या वर्षांच्या तुलनेत टॅंकरच्या फेऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, आजअखेर नऊ तालुक्यांमधील मिळून एकूण १०६ गावांच्या सुमारे १९५ वाडय़ांना या टंचाईचा मोठा फटका बसला आहे. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यात सर्वात जास्त, ३० गावांच्या ४७ वाडय़ांना या टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याखालोखाल खेड तालुक्यातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या तालुक्यातील २३ गावांच्या ३९ वाडय़ांना पाणीटंचाईचा फटका बसला असून चिपळूण (१२ गावे-२८ वाडय़ा), लांजा (११ गावे- २५ वाडय़ा) आणि गुहागर (८ गावे-२६ वाडय़ा) हेही तालुके विशेष टंचाईग्रस्त  आहेत.

या सर्व  गाव-वाडय़ांना सध्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्यासाठी शासकीय आणि खासगी टॅंकरचा उपयोग केला जात असून त्यातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा प्रथमच पंचायत समित्यांच्या खर्चाने या टॅंकरवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यात टॅंकरऐवजी उन्हाळ्यातही पुरेसे पाणी असलेल्या विहिरी अधिग्रहित करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. या विहिरी किंवा कूपनलिकांद्वारे तेथील रहिवाशांची पाण्याची गरज भागवली जात आहे.

जिल्ह्यातील एकूण ९२ ग्रामपंचायतींना त्या त्या भागातील एमआयडीसीच्या धरणतून पाणीपुरवठा केला जातो. पण हेही पाणीसाठे वेगाने आटत असल्यामुळे रत्नागिरीसह काही ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याचा संभव आहे.

रत्नागिरी जिल्ह्याची पावसाची वार्षिक दीर्घकालीन सरासरी सुमारे ३३०० मिलिमीटर आहे. यंदा त्यापेक्षा तब्बल सुमारे एक हजार मिलिमीटर पाऊस कमी पडला. शिवाय, दरवर्षी दिवाळीपर्यंत अधूनमधून पाऊस पडत राहतो. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते. गेल्या मोसमात मात्र सप्टेंबरनंतर पाऊस पूर्णपणेच थांबल्याने ही पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वात जास्त खाली गेली आहे.

दरम्यान गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. लांजा तालुक्यात सर्वात जास्त, ६३.११ मिलीमीटर पावसाची नोंद या दोन दिवसात झाली. त्याचप्रमाणे रत्नागिरी  (५२ मिमी), दापोली (४८ मिमी), गुहागर (४५ मिमी), चिपळूण व संगमेश्वर (४३ मिमी) या तालुक्यांमध्येही वळिवाच्या जोरदार सरी बरसल्या. पण त्यामुळे पाणी साठय़ामध्ये अजिबात भर पडलेली नाही.   या पाश्र्वभूमीवर शासकीय पातळीवरून विविध उपायांद्वारे या समस्येचा सामना करण्याचे प्रयत्न सध्या सुरू असले तरी मान्सूनच्या पावसाचे थोडे उशिरा आगमन लांबत असल्याने ही टंचाई आणखीच वाढण्याची चिन्हे आहेत.