पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील २२ गावांना भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र स्थानिक तहसीलदार आणि गटविकास अधिकारी याकडे लक्ष देत नाही. येत्या ४८ तासांत खारेपाटातील गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी प्रशासनाला दिला. खारेपाट विभागातील पाणी समस्येबाबत प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि पेण तालुक्यातील २२ गावांना तातडीने टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राऊत, अविनाश म्हात्रे, नरेश गावंड उपस्थित होते. पेण तालुक्यातील वाशी, वढाव, कणे, बोर्झे, दिव, काळेश्री, नारवेल, बेणवले, िशगणवट, सरेभाग, मसद, घोडाबंदर, बोरी, शिर्की चाळ, बेणेघाट आदी गावांना सध्या भीषण पाणी टंचाईला सामोर जावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. टेम्पो आणि ड्रममधून २०० ते २५० रुपये भरून पाणी आणावे लागत आहे. दुसरीकडे पेण पंचायत समितीकडून पाणी टँकर उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे खारेपाट विभागातील लोकांचे हाल होत आहेत. दुसरीकडे हेटवणे धरणातील पाणी समुद्रात सोडले जात आहे. यासर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि हेटवणे धरणातून वाया जाणारे पाणी खारेपाट विभागाला देण्यात यावे अशी मागणी यावेळी देसाई यांनी केली. एकीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावांना वॅगन रेल्वे आणि टँकरव्दारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तर दुसरीकडे कोकणात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी उपलब्ध होत नाही. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने नागरिकांना हक्काचे पाणी मिळू शकलेले नाही. येत्या ४८ तासांत खारेपाट विभागाला टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू झाला नाही. तर शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. सत्तेत असूनही सेनेवर आंदोलनाची वेळ राज्यात आणि केंद्रात शिवसेना सत्तेत आहे. मात्र असे असूनही शिवसेनेला आंदोलन करण्याची वेळ का येते? याबाबत विचारले असता स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आमची सत्ता नाही. स्थानिक आमदार आमचे नाहीत. त्यांना हा प्रश्न सोडवण्यापेक्षा तो चिघळत ठेवण्यात रस आहे. अधिकारी त्यांच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे शिवसेनेला आंदोलन करण्याची वेळ आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.