सरकारकडून तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शहर महापालिकेला या वर्षी निधी मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने स्वनिधीतून टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी १४ टँकर भाडय़ाने घेतले आहेत. शुक्रवारपासून महापालिकेच्या १४ टँकरमधून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ झाला. शहरातील तीन प्रभाग समितीअंतर्गत प्रत्येक प्रभागात चारप्रमाणे १२ टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. दोन टँकर मागणीनुसार पाठविण्यात येणार आहेत. सरकारकडून तातडीच्या पाणीपुरवठा योजनेतील निधी न मिळाल्याने पाणीपुरवठय़ासाठी टँकर उपलब्ध करून देण्यास वेळ लागला, याबद्दल स्थायी समितीचे सभापती विजय जामकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. उपमहापौर भगवान वाघमारे यांनी शहरातील बऱ्याच प्रभागांत जलवाहिनी नसल्याने पाणीपुरवठा होत नाही. तसेच त्या भागातील बोअरसुद्धा आटले आहेत, अशा भागात १२ हजार लिटरचे ८ टँकर, तर ६ हजार लिटरचे ६ टँकर पाणीपुरवठय़ासाठी वापरण्यात येणार आहे. या टँकरचे नियंत्रण सहायक आयुक्त यांच्याकडे राहणार आहे. शहरातील हातपंप दुरुस्ती व लिकेजस काढण्याचे काम चालू आहे. आपल्या कॉलनीमध्ये महापालिकेचे टँकर येत नसेल, तर प्रभाग समितीस लेखी कळवावे, असे आवाहन उपायुक्त रणजित पाटील यांनी केले. लोकसेवकांच्या मोफत पाणीपुरवठा टँकरवर करडी नजर राहणार असून जलकुंभावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले आहेत. ममता कॉलनी, ख्वाजा कॉलनी, खंडोबा बाजार या जलकुंभाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.