महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तीन मे नंतर निर्बंध शिथील करण्याचे संकेत दिले. विशिष्ट भागातील परिस्थिती पाहून तीन मे नंतर आम्ही निश्चित निर्बंध शिथील करु, पण जनतेला त्यांनी सावध राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

‘आपण सावध राहून सहकार्य केले नाही तर, मागच्या काही दिवसात आपण जे साध्य केले आहे, ते गमावू शकतो’ असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘सावध आणि संयम राखून आपण पुढे जाऊ’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. लॉकडाउनचा दुसरा टप्पा येत्या तीन मे रोजी संपणार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री काय घोषणा करतात? याकडे सगळयांचे लक्ष लागले होते.

“जनतेने करोना व्हायरसची भिती मनामध्ये बाळगू नये. फक्त वेळेत उपचार होणे आवश्यक आहे. काही दिवसांच्या बाळापासून ते ८३ वर्षाच्या वृद्धापर्यंत करोना व्हायरसमधून बरे होऊन लोक घरी गेले आहेत. व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण सुद्धा करोनामधून बरे झाले आहेत” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आणखी वाचा- लॉकडाउननंतर कोणत्या शहरात काय होणार? वाचा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबईत करोना रुग्णांची संख्या का वाढतेय?

करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी लॉकडाउनचा फायदा झाला असा दावा त्यांनी केला. “लॉकडाउन नसता तर कल्पना करु शकत नाही, असा करोना विषाणूचा गुणाकार होऊन रुग्ण संख्या वाढली असती. लॉकडाउनमुळे करोना विषाणूचा गुणाकार नियंत्रणात ठेवणे शक्य झाले” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“लॉकडाउन असतानाही करोना रुग्णांची संख्या कशी वाढतेय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मुख्य म्हणजे पहिल्यांदा करोना व्हायरची लागण झालेले रुग्ण ज्या भागामध्ये सापडले, तिथे त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जणांना बाधा झाली. कंटेनमेंट झोन जे आहेत, जे आपण सील केलेत तिथे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. करोनाच्या ७५ टक्के रुग्णांणध्ये सौम्य, अतिसौम्य आणि लक्षणेच दिसत नसलेले रुग्ण आहेत. पण ते करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना सुद्धा आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येत आहे. कारण लक्षणे दिसत नसली तरी करोना विषाणूचे ते वाहक ठरु शकतात असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.