गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस पुढील काही दिवस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 18 ते 20 सप्टेंबर या कालावधीत राज्यभरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

सोमवारी रात्रीपासूनच भिवंडी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक दुकांनांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. तसंच बाजारपेठांमध्येही पाणी शिरल्याने अनेक व्यापाऱ्यांचेही मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली होती. मुंबई परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. तर नवी मुंबई, ठाणे आणि डोंबिवली परिसरातही पावसाची रिमझिम सुरू आहे. तर रायडमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर ठाणे, कल्याण, पनवेलच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसधार स्वरूपाचा पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी दिली.

परंतु बुधवार 18 सप्टेंबर ते शुक्रवार 20 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर बुधवारीही राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.