विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १८ दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यपालांनी भाजपाला सत्तेस्थापनेसाठी शनिवारी आमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळेच आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापनेच्या हलचाली सुरु केल्या आहेत. मात्र शिवसेनेने भाजपाबरोबर युती करुन अशाप्रकारे आघाडीच्या सोबतीने सरकार स्थापन करणे नैतिकतेला धरुन नसल्याची टीका भाजपाच्या समर्थकांकडून केली जात आहे. मात्र अशाप्रकारे विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी एकत्र येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे प्रकार घडले आहेत. जाणून घेऊयात वेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यावर नक्की काय होते?, ते एकत्र का येतात?, यासंदर्भातील इतिहास काय सांगतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आलेच तर या सरकारचं भविष्य काय असेल?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्याआधीच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीला दिलेला २४ तासांचा वेळ पूर्ण होण्याआधीच राष्ट्रपती राजवटीच्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.