अनलॉक २ म्हणजे काय ते त्याचा सुस्पष्ट खुलासा झालाच पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आजच महाराष्ट्र सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांनी अनलॉक २ म्हणजे काय याचा सुस्पष्ट खुलासा करावा अशी मागणी केली आहे. गेल्याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी अनलॉक १ ची घोषणा केली होती. त्यानंतर लॉकडाउन हा शब्द आपण मागे ठेवून आता अनलॉक २ चा उच्चार केला. त्यानंतर आता फडणवीस यांनी अनलॉक २ बाबत प्रश्न विचारला आहे.

आजच महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.  ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.