नेहरू, गांधींचे विचार सोडून काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना मातोश्रीच्या दारात जावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्थान आहे याबद्दल न बोललेच बरे, मी पक्ष सोडला म्हणून त्यांना पद मिळाले. आता मंत्रिपद टिकविण्यासाठी त्यांची धडपड आहे. कोण कोणाच्या पाया पडतो हे पाहणारे आ. थोरात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात थांबून काय करत होते? भ्रष्टाचाराच्या फाइल काढू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांचे पाय दाबत होते की, भाजपमध्ये घ्या म्हणून विनवणी करत होते, यावरही त्यांनी बोलले पाहिजे असे आव्हान माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी दिले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी  केलेल्या वक्तव्याचा आ. विखे यांनी जोरदार समाचार घेतला. लोणी येथे शनिवारी आ. विखे म्हणाले की, प्राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाला आठ आठ दिवस मुख्यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत हेच मोठे दुर्दैव असल्याकडे लक्ष वेधून एवढी लाचारी पत्करून सत्तेत का राहता, सत्तेत आम्हाला स्थान राहू द्या यासाठीच आता मातोश्रीवर वाऱ्या सुरू आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा थोरातांच्या कार्यालयात

महसूलमंत्री असताना मागील कार्यकाळात खासगी सचिव असलेले सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा थोरातांच्या कार्यालयात कसे दिसतात? त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली, मागील पाच वर्षे हे अधिकारी घरी बसले होते. आता पुन्हा मंत्री झाल्यानंतर हेच अधिकारी थोरातांच्या कार्यालयात मागे बसून काय करतात,असे ते म्हणाले.