परभणी : जिल्ह्यतील ११ लाख ७६ हजार ९१९ लाभार्थींना केंद्र सरकारकडून माहे मे व जून महिन्यात गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे. याकरिता जिल्हयातील मे महिन्यासाठी ३५ हजार ३०८ क्विं.गहू व २३ हजार ५३७ क्विं.तांदळाचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यतील पात्र शिधापत्रिकाधारकांनी मे महिन्यात नियमित योजनेचे धान्य उचल केले आहे. अशा लाभार्थींनी त्याच महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मोफतच्या धान्याची उचल करावी. तसेच जून महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मोफतच्या धान्याचा लाभ घ्यावा. याप्रमाणे शिधापत्रिका धारकांनी संबंधित रास्तभाव दुकानदारांकडून दोन्ही योजनेचे धान्य प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा यांनी केले आहे. करोना पार्श्वभूमी वर केंद्र शासनाकडून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मे व जून-२०२१ महिन्यात गरिबांना रेशन दुकानातून गहू व तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. परभणी जिल्हयातील प्राधान्य कुटुंब योजनेतील ९ लाख ७६ हजार २२५ लाभार्थी व अंत्योदय योजनेतील २ लाख ६९४ लाभार्थी अशा एकूण ११ लाख ७६ हजार ९१९ लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. तसेच करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमी वर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक साहाय्यांतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय योजनेच्या ४२ हजार ४३ कार्डधारकांना ९ हजार ६२० क्विं.गहू व ४ हजार ९२७ क्विं. तांदूळ माहे मे २०२१ करिता ( प्रतिशिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य ) तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या ९ लाख ७६ हजार २२५ लाभार्थींस प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे २९ हजार ७९१ क्विं.गहू व १७ हजार ९७७ क्विं.तांदूळ परभणी जिल्ह्यत मोफत देण्यात येत आहे, असेही कळविण्यात आले आहे.