कराड : जिथे साधा रस्ताही चांगला नाही त्याला महामार्ग म्हणत पुणे ते सातारा दरम्यान केली जाणारी टोल वसुली आणि त्यात नुकतीच केलेली वाढ ही चीड आणणारी असून ती तातडीने मागे घेण्याची मागणी,  खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील पुणे ते सातारा दरम्यानच्या आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यांवरील टोल आकारणीत नुकतीच वाढ करण्यात आली आहे. यावर टीका करत उदयनराजे यांनी वरील मागणी केली आहे.

उदयनराजे म्हणाले, की  वास्तविक या मार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सन २०१३ मध्ये पूर्ण होणार होते. यासाठीची मुदत संपून ८ वर्षे लोटली. मात्र, आजही कामे अपूर्णच आहेत. या कामामुळे असलेल्या महामार्गाची देखील  दुरावस्था  झाली आहे. अशातच गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या कामासाठी म्हणून येथून प्रवास करणारे हा अन्यायकारक टोल भरत आहेत. आता हे अर्धवट काम पूर्ण करण्यापूर्वीच त्यात पुन्हा वाढ करणे केवळ अन्यायकारकच नाही, तर चीड आणणारे  आहे. हा टोल रद्द किंवा कमी व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले.  मत मात्र त्यात वाढ करणे हे केवळ अन्यायकारक नाही, तर चीड आणणारे आहे.