महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्याविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न केले. बहुमताचा आकडा टिकवण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेनेकडून आपले आमदार एकत्र ठेवण्याचे प्रयत्न केले गेले. तिन्ही पक्षांनी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. मात्र आता सत्ता स्थापनेनंतर आमदारांच्या हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का, असा उपरोधिक टोला अभिनेता सुमीत राघवनने लगावला आहे.

सुमीत या विषयावर ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झाला. ‘ट्रायडंट, रेनेसन्स, ललित, हयात, मॅरिएट या हॉटेल्सनी त्यांच्या मेनूकार्डमधून ‘खिचडी’ हा पदार्थ वगळावा. पण आता या हॉटेल्सची बिलं कोण भरणार? बहुधा शेतकरी’, असा उपरोधिक टोला सुमीतने लगावला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना आमदारांचा मुक्काम हॉटेल रिट्रीटमध्ये हलविण्यात आला होता. हॉटेल रिट्रीटनंतर शिवसेनेच्या आमदारांना हॉटेल ललितमध्ये नेण्यात आलं होतं. तर आमदारांचा घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने आपले आमदार जुहूच्या जे. डब्लू. मॅरिएटमध्ये ठेवले होते. राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना ठेवण्याची व्यवस्था पवई येथील रिनेसन्स हॉटेलात केली होती.