भाजपाचं म्हणणं आहे की आमच्या १०५ जागा आल्या. मात्र त्या जागा त्यांना शिवसेनेच्या जोरावर मिळाल्या आहेत. ज्या शिवसेनेला ते विसरुन गेले. त्याचमुळे त्यांची सत्ता आली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांन म्हटलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत तीन भागांमध्ये होणार आहे. आज या मुलाखतीचा पहिला भाग पार पडला. या भागात संजय राऊत यांनी १०५ आमदार असूनही भाजपाची सत्ता का आली नाही? हा प्रश्न विचारला.

आणखी वाचा- शरद पवार म्हणाले, शिवसेनेशी वैचारिक मतभेद पण…

या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणतात “प्रमुख पक्ष प्रमुख कसा बनला याच्याही खोलात गेलं पाहिजे. भाजपाच्या ज्या १०५ जागा निवडून आल्या त्या जागांमागे शिवसेनेचं योगदान मोठं होतं. मात्र या योगदानाचा भाजपाला विसर पडला. तुम्ही शिवसेनेला बाजूला काढलंत. शिवसेना भाजपाच्या सोबत नसती तर १०५ ची संख्या कुठेतरी ४०-५० च्या आसपास असती. गेली काही वर्षे जो ट्रेंड बघायला मिळाला तोच ट्रेंड शिवसेना नसती तर भाजपाच्या जागांबद्दल बघायला मिळाला असता. त्यामुळे १०५ जागांबाबत जे भाजपाचे नेते सांगतात की आम्हाला सहकाऱ्यांनी दुर्लक्षित केलं. मात्र १०५ या संख्येपर्यंत भाजपा ज्यांच्यामुळे पोहचली त्यांनाच गृहित धरलं गेलं.”

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा- बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपाशी सुसंगत कधी वाटलीच नाही : शरद पवार

शिवसेनेचा भाजपाला विसर पडला. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. २०१९ ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जे काही महाराष्ट्रात घडलं ते आत्तापर्यंत महाराष्ट्रात कधीही घडलं नव्हतं. याचबाबत जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलं आणि भाजपाला शिवसेनेचा विसर पडल्यानेच ते सत्तेवर येऊ शकले नाहीत हेदेखील स्पष्ट केलं.