क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर यांनी आज तालुक्यातील करंजी गावाला धावती भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोणतीही पूर्वकल्पना न देता आलेल्या या अनाहूत पाहुण्यामुळे करंजी ग्रामस्थ मात्र चांगलेच भारावून गेले होते.रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक आलिशान गाडी करंजी येथील भट्टेवाडी येथे दाखल झाली. या गाडीत नेमके कोण आहे म्हणून काही ग्रामस्थ गाडीच्या जवळ गेले असता त्या गाडीतून अंजली तेंडुलकर व त्यांच्या मावसबहीण श्रीमती कलीआ चाँदमाल या गाडीतून उतरल्या. चाँदमल या शेतीतज्ज्ञ असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करतात. चाँदमल यांच्या विनंतीवरून ग्रामीण भागातील शेतीची पहाणी करण्यासाठी तेंडुलकर या रविवारी भटेवाडी येथे आल्या होत्या. त्या आल्याचे कळताच या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. करंजीचे रहिवासी व सेनेचे तालुकाध्यक्ष शेख यांनी तेंडुलकर यांचे यावेळी संत्रा मोसंबी आणि डाळिंबाची फळे देऊन स्वागत केले. करंजी येथील भटेवाडी येथे सोशल सेंटर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले जाते. त्यानिमित्ताने गोवा येथून तेंडुलकर यांची मावसबहीण श्रीमती कमीआ चाँदमाल व अॅलीक्स मायकल करंजी येथील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी गेली आठ दिवसांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे आपली बहीण ग्रामीण भागात एका खेडेगावात नेमकं काय काम करतेय ते पाहाण्यासाठी सचिनची पत्नी अंजली यांनी थेट करंजी गाठली. यावेळी सखाराम क्षेत्रे, महादेव गाडेकर, पप्पू क्षेत्रे यांच्या शेतीमध्ये नैसर्गिक शेती कशा पद्धतीने करावी याचे प्रात्यक्षिक सुरू असून कुठल्याही प्रकारचे रासायनिक खते न वापरता तयार करण्यात आलेले चिकू, संत्रा, मोसंबी, केळी, वांगे, पालकभाजी, कोथिंबीर या फळबागांची पहाणी सौ तेंडुलकर यांनी यावेळी केली. काळ बदलत चालला असून उद्योगधंद्यांमध्ये थोडी मंदीची लाट असल्याने शेती हा तर शेतकऱ्यांच्या जीवन जगण्याचा महत्त्वाचा पर्याय असल्याने शेती करण्याची आवड असल्याचे अंजली तेंडुलकर यांनी यावेळी सांगत अतिशय मनमोकळेपणाने येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या निधीतून भटेवाडी येथे सभामंडप व काँक्रीट रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी रफीक शेख यांनी तेंडुलकर यांच्याकडे केली. तेंडुलकर यांनी भटेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या घरीच दुपारचे जेवण घेत दूध आणि बाजरीची भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेसा घेत जेवण घेतले. जाताना या ठिकाणी मी सचिनला घेऊन येईन. शेतकऱ्यांच्या व्यथा सचिनला माहीत आहे. काही गावे त्याने दत्तक म्हणही घेतली आहेत. बहिणीने राबवलेल्या उपक्रमाची पहाणी करण्यासाठी तुमच्या आवडत्या सचिनला पुढच्या वेळेस घेऊन येईन असे जाताना अंजली तेंडुलकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासित केले. यावेळी छगनराव क्षेत्रे, डॉ. मिच्छद्र गाडेकर, भानुदास अकोलकर, जहांगीर मनियार, ग्रामसेवक राजेंद्र साखरे, तन्वीर शेख, आकाश क्षेत्रे, सचिन मेजर, सुनिल मुरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.